१ जुलै, मंगळवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे कृषी दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. देशभरात शेतकऱ्यांच्या योगदानाची दखल घेण्याचा हा विशेष दिवस! या औचित्याने, लहान वाघोदा (ता. रावेर) येथील प्रगतशील शेतकरी श्री. वसंत भास्कर शिंदे यांचा महाराष्ट्रात खरीप ज्वारी उत्पादनात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मीनल करनवाल मॅडम यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. ही बाब जळगाव जिल्ह्यासाठी निश्चितच अभिमानाची आहे.
एकीकडे हवामानातील बदल, उत्पादन खर्चातील वाढ, कीटकनाशकांचे दुष्परिणाम, बाजारभावातील अनिश्चितता अशा अडथळ्यांवर मात करत शेतकरी पिकवतो, जगवतो आणि देशाची अन्नसुरक्षा सक्षम ठेवतो. अशा काळात वसंत शिंदे यांचे हे यश केवळ वैयक्तिक नाही, तर ते शेतीतील नवदृष्टीचे आणि आधुनिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारे यश आहे.
या यशाचा गौरव करताना प्रशासनानेही सकारात्मक भूमिका बजावली, ही बाब विशेष उल्लेखनीय आहे. आजच्या पिढीतील शेतकऱ्यांना शाश्वत शेतीकडे वळवण्यासाठी अशा प्रेरणादायी उदाहरणांची अत्यंत गरज आहे.
शेती ही केवळ व्यवसाय नसून ती एक संस्कृती आहे. या संस्कृतीचा सन्मान करणाऱ्या शेतकऱ्यांना अशाचप्रकारे दाद दिली गेली पाहिजे. कृषी दिनी वसंत शिंदे यांचा सन्मान म्हणजे मेहनतीचा, जिद्दीचा आणि प्रयोगशीलतेचा सन्मान आहे.