थोरगव्हाण (ता. रावेर ) | दि. १६ जून २०२५
दी एज्युकेशन सोसायटी, थोरगव्हाण (स्थापना १९१७) संचालित डी. एस. देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात २०२५-२६ या नवीन शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ नवनियुक्त मुख्याध्यापक श्री. डी. के. पाटील यांच्या स्वागतपर मार्गदर्शनाने उत्साहात करण्यात आला.
प्रार्थनागीताने सुरुवात झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे प्रेमाने स्वागत करताना श्री. पाटील सरांनी मुलांना 'आई-वडिलांचे चरणस्पर्श करूनच शाळेत यावे' अशी संस्कारमूल्यांची आठवण करून दिली. शाळेच्या प्रांगणात शेडनेट बसवण्यात येणार असून, बाकांची दुरुस्ती देखील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी करण्यात आली आहे.
मुख्याध्यापकांनी शिस्त, स्वच्छता आणि संवाद याबाबत मार्गदर्शन करत सांगितले की, 'शाळा म्हणजे आपले दुसरे घर आहे, येथे खोटेपणा, बेशिस्तपणा सहन केला जाणार नाही.' शाळेतील पंखे, बाक, कपाट यांची नासधूस करू नये, वीज बचतीसाठी शाळा सुटल्यानंतर पंखे बंद करण्याची सवय लावा, अशा उपयुक्त सूचना देण्यात आल्या.
विद्यार्थ्यांनी संवाद करताना मुलींनी "ताई" आणि मुलांनी "दादा" असे संबोधन वापरण्याचे निर्देश देण्यात आले. शाळेतून मध्येच घरी जाताना पालकांच्या उपस्थितीत व वर्गशिक्षकांच्या परवानगीनेच जावे, असे स्पष्ट करण्यात आले.
कु. साक्षी (सावदा येथून) यांनी इंग्रजी शाळेऐवजी थोरगव्हाण विद्यालयात प्रवेश घेतल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. वाढदिवस निमित शिक्षक श्री. एम. के. पाटील यांना लोकमान्य टिळकांचे विचार या पुस्तकाची भेट देऊन गौरव करण्यात आला.
शाळेत विद्यार्थ्यांची गावनिहाय यादी आणि पालकांचे संपर्क क्रमांक अद्ययावत करण्यात येणार आहेत. पालक-शिक्षक संघाच्या स्थापनेसाठी लवकरच सभा आयोजित केली जाणार आहे.
५वी ते ८वीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहाराची सुविधा उपलब्ध असून, विद्यार्थ्यांनी स्वतःची डिश सोबत आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सर्व विद्यार्थ्यांनी व्हारांड्यात एकत्र बसून "वदनी कवळ घेता..." म्हणत आहार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. शाळेतील प्यूरीफायरचे पाणी आणि स्वच्छतागृह योग्यरित्या वापरण्याचे आवाहन करण्यात आले.
शिष्यवृत्ती अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करण्यास सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी पालकांकडे चुकीची माहिती न देता प्रामाणिकपणा बाळगावा.
सहशालेय कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हा, चांगला स्पर्श – वाईट स्पर्श याचे ज्ञान ठेवा, शाळेच्या बस व्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनाने प्रवास टाळा, परीक्षा लेखन कौशल्य वाढवा, आणि कॉपीमुक्त अभियानाचे पालन करा, अशा बहुपर्यायी सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आल्या.
यावर्षी शाळेत विद्यार्थी सांस्कृतिक मंडळ स्थापन करण्यात येणार असून, मॉनिटर निवड लोकशाही पद्धतीने केली जाईल. शालेय शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
शाळा आपली आहे, ती आपल्याच संस्कारांनी घडवूया, या ब्रीदवाक्याने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .
महाशय मुख्याधापक डी के पाटील जेष्ठशिक्षक टि .पी घुले ' वाय जे कुरकुरे मंचावर उपस्थित होते .
सर्व शिक्षक बेधु भगिनी यांनी विद्यार्थ्यांनची शिस्त संभाळली , शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते .