स्वामी रमेशानंद
श्रीराम मंदिर ,भुसावळ येथे सुरू असलेल्या संत एकनाथ विरचित भावार्थ रामायण या प्रवचन मालिकेतील पाचवे पुष्प गुंफताना स्वामी रमेशानंद म्हणाले की रामायणातील सुंदर कांड हे आपल्याला दास्यभाव शिकविते.
सुंदरकांड म्हणजे चिरंजीवी श्री हनुमंत यांची आपल्या स्वामींच्या, श्रीरामांचे प्रति असलेली श्रद्धा,भक्ती, पूर्ण समर्पण, शरणागती, विनयशीलता या सारख्या अनेक गुणांचा समुच्चय असलेला कर्मभाग आहे.
यात हनुमंताची ज्या ज्या लीला केलेल्या आहेत त्या सर्व आदर्श भक्तीचा नमुना आहे. रावणाच्या अहंकाराला त्याच्याच कृतीतून दहन केले आहे. रावणाची अहंकाराची लंका त्याच्याच हाताने, त्याच्याच साधनांनी व त्याच्याच अग्निने जाळून टाकली आहे. श्रीरामाच्या दुताने रामाच्या शक्तीचा परिचय राक्षसांना करून त्याच्या मनात धडकी भरविली आहे. सीतशोधन कार्य पूर्ण करून क्षणभर विश्रांती न घेता ,"आधी असावी श्रांतता l मग घ्यावी
विश्रांती l" याप्रमाणे आपल्या स्वामींचे कार्य केलेले आहे. जातांना वाटेत मैनाक पर्वत , सुरसा , सिंहिका यांनी आकर्षणे , प्रलोभने दाखवली परंतु त्यांचा त्याग करून आपली कार्यसिद्धी पूर्ण केली.
हा हनुमानाचा आदर्श प्रत्येक मनुष्याने आपल्या जीवनात उतरविला तर तो यशस्वी नक्कीच होईल,असे विचार रमेशानंदानी मांडले.
पुढील प्रवचनात रावणवध यावर ते बोलणार आहे. तरी यां प्रवचनांचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन राष्ट्र सेविका समिती च्या सौ . कल्याणी ओक, सौ . जोशी, सौ . मुळे, सौ .सरीता चौक यांनी केले आहे.