भुसावळ: -श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात 27 फेब्रुवारी हा दिवस कवी कुसुमाग्रजांचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात आला. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान प्राचार्य डॉ. रमेश जोशी यांनी भूषवले. याप्रसंगी आपले विचार व्यक्त करताना विद्यार्थी मित्रांना मराठी भाषेचे महत्त्व पटवून देताना अनेक उदाहरण दिले. संत रामदास स्वामींचे मनाचे श्लोक सर्वांसाठी उपयुक्त आहे ,तसेच संत ज्ञानेश्वर, संत नामदेव,
कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या गाण्यांचा उल्लेख केला. तसेच मराठी ही सर्वांना ज्ञान देणारी भाषा आहे मराठी भाषेचे पांग फिटणारे नाही. असे आपले मत मांडले. प्रा .अनुपम शर्मा यांनी कवी कुसुमाग्रजांचे जीवन कसे होते ,त्यांचा परिचय करून दिला. डॉ.सुधीर शर्मा यांनी मराठी भाषा सर्वांनी शिकली पाहिजे असे सांगितले. प्रा. हितेश गुप्ता (ग्रंथपाल) यांनी विद्यार्थ्यांनी ग्रंथालयात येऊन मराठी भाषेतून लहान लहान गोष्टींची पुस्तके वाचावी तसेच मराठी वर्तमानपत्र ही वाचावे जेणेकरून आपल्या मनात मराठी भाषेची आवड निर्माण होईल असे सांगितले. डॉ विवेक जोशी यांनी मराठी भाषेचे महत्त्व पटवून देताना कवी कुसुमाग्रज यांची कणा कविता याविषयी माहिती स्पष्ट करून सांगितली व मराठी भाषा सर्वांनी बोलली पाहिजे असे सांगितले. तसेच राहत शेख, सुरेखा राजपूत, धनराज बाविस्कर, बहुसंख्य विद्यार्थ्यांनी मराठी कविता वाचून कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. ज्योती ओस्तवाल यांनी केले. कार्यक्रमात सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.