- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कृती समितीची बैठक लावण्याचे आ.चंद्रकांत पाटील यांनी दिले आश्वासन
वरणगाव - येथील नगरपरिषद स्थलांतर विरोधी कृती समितीतर्फे नगरपरिषद स्थलांतरला विरोध असून गावातील पाच हजार नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असलेले निवेदन आज शनिवार दि. २६ रोजी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांना वरणगाव न. प. स्थलांतर विरोधी कृती समितीच्या सदस्यांनी दिले. त्यानंतर आ.पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक लावण्याचे कृती समितीला आश्वासन दिले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, वरणगावातील नगरपरिषदची इमारत ही इतिहासकालीन आहे. गावात एकमेक शासकीय वास्तू असल्याने २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट या दिवशी बस स्टँड येथून विद्यार्थांची शाळेची प्रभात फेरी गावात नगरपरिषद जवळ आल्याने या ठिकाणी नगरपरिषदवर असलेल्या तिरंगा राष्ट्रीय ध्वजाला सलामी देऊन विद्यार्थी पुढे मार्गक्रमण करता. हा संपूर्ण क्षण गावातील नागरिकांसाठी स्फुरण आणि ऊर्जा देणारा असतो. सामान्य महीला, नागरिक या गावात मध्यभागी असलेल्या न. प. इमारतीत सहज आपली मूलभूत समस्या घेऊन जातो. गावातून ही इमारत दुसरीकडे गेल्यास नागरिकांना खूप मोठा मनस्ताप होईल. गावाचे वैभव असलेली एकमेव नगरपरिषद इमारत गावातच राहू द्यावी. जेणेकरून गावाचे वैभव गावातच टिकून राहील असेही आमदार चंद्रकांत पाटील यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
निवेदन देतेवेळी नगरपरिषद स्थलांतर विरोधी कृती समितीचे उपाध्यक्ष अश्फाक काझी, सचिव महेश सोनवणे, सहसचिव संतोष माळी, सदस्य शशिकांत चौधरी, सुनील भोई, संदीप वाघ, प्रकाश मराठे आदी उपस्थित होते.
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करून मार्ग निघेल
मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांना वरणगाव नगरपरिषद स्थलांतर विरोधी कृती समितीतर्फे निवेदन दिल्यानंतर कृती समिती सदस्यांनी गावातून नगरपरिषद स्थलांतर झाल्यास नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागनार असल्याचे आ.चंद्रकांत पाटील यांच्या लक्षात आणून दिले. संपूर्ण माहिती जाणून घेतल्यानंतर आ. चंद्रकांत पाटील यांनी तुम्ही कृती समितीचे सदस्य मुंबईला या तुमची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेऊन आपन चर्चा करून योग्य मार्ग काढू असे आमदार चंद्रकांत पाटील यांनी कृती समिती सदस्यांना आश्वासन दिले.