यावल तालुक्यातील एक एप्रिल रोजी झालेल्या पुतळा विटंबना , दगडफेक व दंगल प्रकरणी २०७ जणांवर यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून ७० जणांना आतापर्यंत ताब्यात घेण्यात आले आहे .
अजूनही गावात पोलीसा कडून धरपकड सुरू असून गावात तणावपूर्ण शांतता आहे . सदर घटनेत महीला फौजदारासह एक पोलीस व इतर असे १८ जण जखमी झाले होते . दंगलप्रसंगी दगड , विटा व मिरची पावडर चा उपयोग करण्यात आला होता .
अट्रावल गावात जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी भेट दिली असुन व जादा पोलीस कुमक , दंगा नियंत्रण पथक बोलवण्यात आले होते .या घटनेत एका गटाकडून ५१ आरोपीवर तर दुसऱ्या गटाकडून ५७ आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून , सहाय्यक फौजदार सारिका कोळपकर यांनी ९३ जणांवर गुन्हा दाखल केला असून अशोक बाविस्कर नावाच्या पोलिसाने चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे . सदर घटनेने अनेक वर्षापासून यावल तालुक्यात सलोख्याचे संबंध असलेल्या अट्रावल गावात व्देष भावना निर्माण झाली असून सदर दंगलीच्या गुन्हे हे अनेक वर्ष चालत असल्याने यातील दोन्ही गटाकडील तरुणांचे भविष्य धोक्यात आले आहे . दोन्ही गटातील समाजसेवकांनी शांततेचे आव्हान केले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस तैनात असून अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे .