आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन व “निपुण महाराष्ट्र” अभियान
थोरगव्हाण प्रतिनिधी : युवराज कुरकुरे
दरवर्षीप्रमाणे यंदाही ८ सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात योतो. १९६६ मध्ये युनेस्कोने (UNESCO) या दिवसाची घोषणा केली होती आणि १९६७ पासून जगभर साक्षरतेसाठी जनजागृती केली जाते. शिक्षण हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे याची जाणीव करून देणे, निरक्षरता कमी करणे व समाजाच्या सर्वांगीण विकासाला गती देणे हा या दिवसामागील उद्देश आहे.
या निमित्ताने भारतात व महाराष्ट्रात विविध उपक्रम राबवण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने राबवलेले “निपुण महाराष्ट्र” अभियान विशेष लक्षवेधी ठरले. या अभियानाचा उद्देश इयत्ता तिसरीपर्यंतच्या प्रत्येक बालकाला वाचन, लेखन व अंकगणित या कौशल्यांमध्ये प्राविण्य मिळवून देणे हा आहे. “निपुण बालक, सक्षम भारत” हे अभियानाचे घोषवाक्य असून २०२२ पासून राज्यभर हे अभियान राबवले जात आहे.
“निपुण महाराष्ट्र” अंतर्गत शिक्षक प्रशिक्षण, शैक्षणिक साधनसामग्री, नवनवीन उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे सतत मूल्यमापन यावर भर दिला जातो. या प्रयत्नांमुळे ग्रामीण व शहरी भागातील शैक्षणिक तफावत कमी करण्यास मदत होणार आहे.
खगोलशास्त्र, विज्ञान, समाजशास्त्र अशा विविध विषयांसोबतच साक्षरता आणि अंकगणितातील प्राविण्य हे विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अत्यावश्यक आहे. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाच्या संदेशाशी सुसंगत असा हा महाराष्ट्राचा उपक्रम राज्यातील लाखो विद्यार्थ्यांसाठी नवी दिशा ठरतो आहे.