सेवाभाव आणि गुरु परंपरेचे जतन करणारा लंगर प्रसाद व शरबत वाटप:घोडसगाव गुरुद्वारात गुरु अर्जुन देवजी यांच्या शहीद दिनानिमित्त कार्यक्रम
घोडसगाव (ता. मुक्ताईनगर), दि. ५ जून २०२५ – शिख धर्माचे पाचवे गुरु श्री गुरु अर्जुन देवजी यांच्या शहिद दिनानिमित्त घोडसगाव येथील गुरुद्वारात श्रद्धेने भरलेला "लंगर (प्रसाद वितरण) व खास शरबत वाटप " चालक व वाटसरूना वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास परिसरातील शिख बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुरु परंपरेला मान दिला.
धर्म ही केवळ श्रद्धा नसून सेवा आणि समतेची आचरणशील वाट असते, हे शिख धर्मिय बांधव यांच्या सक्रिय सहभागातून प्रकर्षाने जाणवले. त्यांनी आपल्या नेतृत्वाखाली समाजातील बांधवांना एकत्र आणून श्रद्धेचा आणि समतेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला सर्व उपस्थित समाज बांधूंनी बळ दिले.
कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक अरदास आणि गुरबाणी कीर्तनाने झाली. त्यानंतर गुरुद्वारात .उपस्थित भाविकांसाठी लंगर प्रसादाचे आयोजन करण्यात आले. या पवित्र प्रसंगी बलदेवसिंग, बलजितसिंग, कुलदीपसिंग, गुरदयालसिंग, रविंद्रसिंग , सुकदेवसिंग, गुरुचेतनसिंग चाहेल यांच्यासह अनेक श्रद्धावान शिख बांधव सहभागी झाले.
कार्यक्रमात पिंप्रीसेकम संघर्ष समिती अध्यक्ष रमाकांत चौधरी, जितेंद्र वारके, गणेश तायडे यांचाही सहभाग होता. समस्त जेष्ठ शिख बांधवांनी गुरु अर्जुन देवजींच्या शौर्य व बलिदानावर प्रकाश टाकत, अशा प्रेरणादायी परंपरांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचे महत्व अधोरेखित केले.
गुरु अर्जुन देवजी हे शिख धर्मातील पहिले शहीद गुरु मानले जातात. अन्यायाविरुद्ध आवाज उठवताना त्यांनी बलिदान दिलं, परंतु धर्माच्या मूळ तत्त्वांना त्यांनी डगमगू दिलं नाही. ही शिकवण आजच्या काळात अधिक आवश्यक वाटते.
गुरुद्वारातील लंगर सेवा ही केवळ भोजनाची नव्हे, तर समतेची शिकवण देणारी परंपरा आहे. जात, धर्म, वर्गभेद विसरून एकत्र अन्न घेणे हीच खऱ्या अर्थाने मानवतेची पूजा आहे.
गुरु अर्जुन देवजींच्या बलिदानास नमन करताना समस्त शिख बांधव आजही सेवा, समता आणि सामाजिक ऐक्याचे ज्योत पेटवून ठेवली आहे . हीच खरी गुरुसेवा आणि काळाची गरज आहे.