थोरगव्हाण (ता. रावेर) – शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यासाठी जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे अंतिम वर्षाचे विद्यार्थी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत थोरगव्हान गावात दाखल झाले असून, या उपक्रमामुळे गावात कृषी जागृतीची नवी लाट निर्माण झाली आहे.
प्राचार्य डॉ. शैलेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली, समन्वयक प्रा. बी. एम. गोणशेटवाड व अधिकारी प्रा. व्ही. एस. पाटील यांच्या देखरेखीखाली हे विद्यार्थी गावात वास्तव्यास असून, विविध शेती विषयक माहिती देण्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष सानिध्यात कार्यरत आहेत.
या पथकामध्ये कृषी दूत म्हणून दिनेश दिलीप महाजन, जयेश विठोबा माळी, पवन अरुण पाटील, प्रणव शंकर पाटील व शिवराज सदाशिव शेवाळे हे विद्यार्थी सहभागी आहेत.
कार्यक्रमाच्या प्रारंभी गावचे उपसरपंच श्री नितिन चौधरी यांनी या विद्यार्थ्यांचे स्वागत करताना, "या उपक्रमामुळे थोरगव्हाणच्या शेतीला दिशा लाभेल. शेतकऱ्यांनी या ज्ञानदूतांकडून मिळणाऱ्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा," असे आवाहन केले.
कृषी दूतांकडून खालील उपक्रम राबवले जाणार आहेत:
शेतजमिनीचे माती व पाणी परीक्षण
पिकांची योग्य निवड व आधुनिक लागवड पद्धती
पिकांवरील रोगनिदान व उपचार
प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून शाश्वत शेतीच्या संधींचे सादरीकरण
गावातील उपसरपंच नितिन चौधरी व अनेक शेतकरी यांनी कृषी दूतांच्या भेट घेतली . विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत शेतकऱ्यांचे अनुभव जाणून घेतले आणि समस्यांवर उपाय सुचवण्याचे आश्वासन दिले.
हा उपक्रम केवळ एक शैक्षणिक भाग नसून, गावकऱ्यांना नव्या शेती ज्ञानाने समृद्ध करणारा ठरेल, असा विश्वास ग्रामस्थांमध्ये निर्माण झाला आहे.